औरंगाबाद- शहराच्या जिव्हाळ्याचा आणि अतिशय महत्वाचा असलेल्या समांतर आणि भूमीगत प्रकल्पा संदर्भात आज महापौरांच्या बंगल्यावर मनपा पदाधिकारी आणि ठेकेदार, कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. याबैठकीत नेहमीप्रमाणे त्याच त्या विषयांवर केवळ चर्चा झाली.
समांतर
प्रकल्पाच्या विषयामध्ये कंपनीने आणखी एका भागीदाराला समावेश करून घेणे, मनपाच्या
मालमत्ता गहाण ठेवणे तसेच कामाचे साहित्य बदल करणे अशा प्रकारच्या विषयांवर या
अगोदरही चर्चा झाल्या आहेत. आज परत त्याच त्या विषयांवर चर्चा करून महापौरांनी काय
साध्य केले? हा प्रश्न
अनुत्तरीतच आहे.
महापौर, आयुक्त आणि
पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेत स्वतंत्र दालन आहे तसेच मनपाकडे अनेक सभागृह देखील
आहेत असे असतानाही तेथे बैठक न घेता महापौर बंगल्यावर बैठक घेण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतो. बैठकीनंतर कंपनीला या
विषयावर विचार करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली असून नेहमीप्रमाणेच अंतिम निर्णय
आठ दिवसात होईल असे महापौरांनी सांगितले. याबैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती
सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक, समांतर कंपनीचे ब्रिजेश गुप्ता यांच्यासह मनपाचे संबंधित
अधिकारी उपस्थित होते.
भूमिगत गटार योजनेचे काम मार्गी
भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराने 80 टक्के काम पूर्ण
केले असून उर्वरित 20 टक्के काम उद्यापासून सुरु होणार आहे. संबंधित ठेकेदाराला
त्याने पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती
महापौरांनी दिली. भूमिगतचे 20 टक्के काम रखडलेले असून ते पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास
महामंडळ, रेल्वे प्रशासन
यांची परवानगी आवश्यक असल्याने संबंधित खात्याकडून लवकरच परवानग्या घेण्यात येतील.
यासह ठेकेदारासोबत बारा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास मनपा
स्वखर्चाने 70 किमीचे पाईप विकत
घेऊन ठेकेदाराला देणार आहे व हे काम त्याच ठेकेदाराकडून पूर्ण केले जाणार आहे.















